पुस्तक परिचय : दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी (बालाजी सुतार)
अस्वस्थ वर्तमान, बेरोजगारी; शहरीकरणाच्या रेट्यात गुदमरणारा, घुसमटणारा निमशहरी, ग्रामीण भाग; तरुणांच्या आकांक्षा धारातीर्थी पडणे; ऑनलाइन मैत्री आणि भ्रमनिरास; असे आधुनिक जगण्याचे वेगवेगळे पदर, त्यातले हेलकावे, त्यात अडकलेल्या व्यक्तिरेखा, त्यांचे मूड्स, यांच्याबद्दलचं हे लिखाण आहे. आणि ते प्रभावी आहे. पुढे पुढे वाचत राहावं असं वाटणारं आहे. पुस्तकाचं ब्लर्ब वाचून हा कथासंग्रह असल्याचा माझा समज झाला होता. पैकी तीन व्यवस्थित ’कथा’ म्हणाव्यात अशा आहेत. त्यातली ’दोन जगातला कवी’ ही कथा मला खूप आवडली. कथेचा शेवट किंचित प्रेडिक्टेबल असूनही ’फँड्री’ सिनेमाप्रमाणे वाचकाला जोरदार फटकावतो. दुसरी कथा ’निळ्या चमकदार काळोखातले अप-डाऊन्स’ ऑनलाइन मैत्री-चॅटची दुसरी बाजू सांगणारी आहे. त्याला स्त्री-पुरुष भेदाभेदाचाही पदर आहे. काही ठिकाणी ही कथा जरा टिपिकल वळणावर जाते. त्यामुळे मला खूप आवडली नाही. तिसरी ’डहूळ डोहातले भोवरे’ सुद्धा ठीकठाक वाटली. प्रसंग, व्यक्तीचित्रण, वातावरणनिर्मिती तिन्हीतली आवडली. दोन निमकथा-टाइप आहेत. त्यातली वातावरणनिर्मितीही खूप छान आहे. बाकी लेख म्हणजे निरिक्षणं, नोंदी...