Posts

Showing posts from November, 2009

मी, एक ‘गजर’वंत

अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. अखिल मानवजातीची ही जी काही धावपळ, धडपड चालली आहे ती या गरजा भागवण्यासाठीच. त्या धावपळीत माझाही रोजचा थोडाफार वाटा असतोच. या दैनिक धावपळीचं अविभाज्य अंग म्हणजे पहाटे लवकर उठणे आणि माझं घोडं, जागं होता होता, पहिलं तिथेच अडतं! त्यामुळे, रोजची ही धावपळ सत्कारणी लावायची असेल तर माझ्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या यादीत अजून एका गोष्टीचा समावेश होणं अतिशय गरजेचं आहे आणि ती गोष्ट म्हणजे गजराचं घड्याळ! रोज सकाळी कानाशी घड्याळाच्या गजरानं बोंबाबोंब करणं ही माझी दिनक्रमातली पहिली आणि मूलभूत गरज आहे. त्या गजरानं जर योग्य वेळी मला उठवलं नाही तर मग (उठण्याच्या बाबतीत) माझ्यावर पूर्णपणे अवलंबून असणार्‍या बाकीच्या दोघांचं काही खरं नसतं... मग आदल्या दिवशीच्या उरलेल्या ‘अन्ना’चा नाश्ता उरकावा लागतो, इस्त्री-बिस्त्रीच्या फारश्या फंदात न पडता शाळेची आणि ऑफिसची ‘वस्त्रं’ अंगावर चढवावी लागतात आणि धावतपळत ‘निवारा’ सोडावा लागतो. गजराच्या मदतीशिवाय स्वतःहूनच पहाटे उठणारे आणि उठल्या उठल्या टवटवीतपणे लगेच आपापल्या कामाला लागणारे तमाम ‘उषाचर’ प्राणी म्हण

हिमालय ही चीजच तशी आहे...!!

Image
उत्तर भारतातली कुठलीही सहल करायची म्हटली की आपल्याला आधी आठवते ती तिथली थंडी आणि पाठोपाठ आठवतो तो बर्फ. ‘नॉर्थ’ची सहल केली पण बर्फ बघितला नाही असं जर कुणी आपल्याला सांगितलं तर गोव्याला जाऊन समुद्र न बघता परतलेल्या माणसासारखं आपण त्या व्यक्तीला लगेच मूर्खात काढू. उत्तर भारताचं पर्यटन आणि बर्फाच्छादित शिखरं यांचं असं इतकं घट्ट नातंच आपल्या मनात आपण बाळगलेलं आहे.त्यामुळे एखादा वारकरी विठ्ठलदर्शनासाठी जितका आसुसलेला असतो तितकीच, किंबहुना त्याहून कणभर जास्तच मी आसुसलेले होते त्या बर्फाच्छादित शिखरांचं दर्शन घेण्यासाठी आणि ‘देवभूमी उत्तरांचल’मधे प्रवेश करून दोन दिवस उलटून गेले तरी त्या दर्शनाचा लाभ काही होत नव्हता.काय गम्मत आहे! तिकडे देशाच्या दुसर्‍या टोकाला केरळ पर्यटनाच्या जाहीरातीतही आपण ‘गॉड्स ओन कंट्री’ असं लिहीलेलं वाचतो आणि नवी दिल्लीहून राष्ट्रीय महामार्ग क्र. ८७चं बोट पकडून नैनितालला जाताना उधमसिंगनगरच्या जरासं अलिकडेही ‘देवभूमी उत्तरांचलमें आपका स्वागत है।’ अशा पाटीनंच आमचं स्वागत केलं. (उधमसिंग या शब्दामुळे असेल कदाचित पण इतकी वर्षं उधमसिंगनगर हे गाव/शहर पंजाबमधे आहे असंच मला वाट

कॉर्बेटचा वाघ

"काय मग? कशी झाली तुमची ट्रीप? कॉर्बेटमध्ये दिसला का काही वाघ-बिघ?" नैनीताल-मसूरी-जिम कॉर्बेट नॅशनल पार्क अशी, म्हणजे थोडक्यात उत्तरांचलची सहल करून आल्यानंतरच्या आठवड्याभरात किमान दहा पंधरा वेळा तरी हा प्रश्न आम्हाला विचारला गेला. (आणि त्या प्रश्नाला आम्ही तितक्यांदाच नकारार्थी उत्तर दिलं. खोटं कशाला बोलू?) खरंतर उत्तरांचल म्हणजे हिमालयाच्या जवळपास(च) कुठेतरी येतं इतपत सामान्यज्ञान सर्वांनाच असतं। पण म्हणून "मसूरीला दिसली का काही बर्फाच्छादित शिखरं-बिखरं?" असा प्रश्न कुणालाही विचारावासा वाटला नाही. त्या प्रश्नाला तर आम्ही ‘होऽऽ! भरपूर...’ असं उत्तर द्यायला आसुसलो होतो. पण ते नाही; व्याघ्रदर्शनाची मात्र पदोपदी चौकशी!जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट देऊन आलेले, किंबहुना कुठल्याही नॅशनल पार्कला भेट देऊन आलेले, न आलेले, सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आमचं ते नकारार्थी उत्तर ऐकल्यावर एक प्रकारचं मंद स्मित झळकायचं. म्हणजे, ‘असंच पाहीजे! तुम्हाला पण नाही ना दिसला? आम्हाला पण नव्हता दिसला.’ किंवा ‘नाही दिसत ना तिथे वाघ? म्हणूनच आम्ही तिथे जाण्याच्या फंदात पडत नाही.’ असे काहीतरी भाव