पालवी
आमच्या घराच्या खिडकीतून हे असं दृष्य दिसतं. वसंत ऋतू काय आला आणि बघता बघता हे चित्र पालटलं. पिंपळाच्या निष्पर्ण फांद्यांच्या टोकावर एक निराळीच लगबग सुरू झाली. आणि एक दिवस सकाळी सकाळी या कोवळ्या आश्चर्याच्या निरनिराळ्या आविष्कारांनी स्वतःच्या उपस्थितीची मला दखल घ्यायला लावली. ... आणि मग मला दर तासा-दोन तासांनी ती दृष्य न्याहाळण्याचा नादच लागला. निसर्ग हळू हळू कात टाकू लागला. ताजी, लुसलुशीत, कोवळी, मऊशार पानं! जणू गोंडस, गोजीरवाणी बाळं! त्यांच्या लीला बघाव्या तितक्या थोड्या! मानवानं सारासार विचार करणं सोडून दिलेलं असलं तरी सृष्टीनं अजूनही आपला आशावाद सोडलेला नाही. नव्या उत्साहानं, उमेदीनं प्रत्येक फांदी या तान्ह्या बाळांच्या बोबड्या बोलांत हरवून गेलीय. या सुरूवातीच्या टप्प्यात वसंतातल्या उन्हाच्या रूपातलं मऊमऊ भाताचं मंमं या बाळांना पुरेसं आहे. पण जसजशी ती मोठी होतील, त्यांचं विश्व विस्तारेल तसतशी त्यांची भूक वाढेल. ते पावसाची वाट बघायला लागतील. ते जेवण त्यांना हवं तितकं, हवं तेवढं... पुनःपुन्हा, वर्षानुवर्षं... आपण पुरवू शकू?? जरा विचार करा.