तीन बेटांची कहाणी (रेफ्युजी मालिकेतला पुढचा लेख)
You have to understand, That no one puts their children in a boat Unless the water is safer than the land... - वारसन शायर, ब्रिटिश कवयित्री १. ऑक्टोबर २०१३, एका संध्याकाळी उशीरा उत्तर आफ्रिकेतल्या लिबियाच्या किनार्यावरून एक बोट निघाली. बोटीत सिरियातले जवळपास ५०० निर्वासित होते. बोट भूमध्यसमुद्रातून निघाली. पुढे सर्वात जवळचा देश म्हणजे इटली. ती रात्र आणि पुढचा संपूर्ण दिवस बोट पाणी कापत चालली होती. त्या वाटेवर इटलीच्या मुख्य भूमीच्या बरंच आधी लाम्पेदूसा हे इटलीच्याच अखत्यारीतलं बेट येतं. दुसर्या दिवशी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या बेटाच्या थोडं अलिकडे असताना बोट उलटली. लाम्पेदूसा बेटाच्या पूर्वेकडे माल्टा हा लहानसा देश आहे. इटली आणि माल्टाच्या जहाजांनी काही निर्वासितांना वाचवलं; पण त्यादिवशी जवळपास २७० जणांना (त्यांत ५०-६० लहान मुलंही होती) आपले प्राण गमवावे लागले. जीवाच्या भीतीने सगळे निघालेले; त्यांना आशा होती, की एकदा लाम्पेदूसाला पोहोचलो की झालं; मग आपण दुसर्या जगात असू; तिथे सगळं आलबेल असतं असं म्हणतात. मधला हा एक समुद्र तेवढा पार करायचा. त्याच्यावरच ...