तूऽऽ मेनी पीपल्स!!
    मित्रमंडळींच्या  एका व्हॉट्सअॅप ग्रूपवर एकाने ताजमहालाचे स्वतः काढलेले काही अप्रतिम  फोटो पोस्ट केले. आम्ही सारे फोटोंचं कौतुक करत असताना तो म्हणाला,  ‘साडेचार तास रांगेत उभे होतो, खूप गर्दी होती’... ते वाचून माझ्या पोटात  गोळाच आला...  गर्दी पर्यटनाचे आमचे एक-एक अनुभव डोळ्यांपुढे यायला लागले...    ६-७ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. अमृतसरमध्ये होतो. सकाळी लवकर उठून  सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग दोन्ही ठिकाणांवर टिक-मार्क करून, दुपारी जरा  आराम करून मग वाघा बॉर्डरला जायचं असा विचार होता. पण आम्ही ठरवलेल्या  जीपचा ड्रायवर म्हणाला, दुपारी लवकर निघू, नंतर खूप गर्दी होते. गर्दी होते  म्हटल्यावर काय, आमचं बोलणंच खुंटलं. जेवल्या-जेवल्या निमूट निघालो.    दुपारी दोन-अडीच वाजता वाघा बॉर्डरनजिकच्या वाहनतळापाशी आम्ही पोहोचलो  तेव्हा तिथे जवळपास शुकशुकाट होता. आम्ही आलो तोच हमरस्ता पुढे जात होता;  मात्र तो एका मोठ्या फाटकाने बंद केलेला होता; तिथून पुढे वाहनं न्यायला  परवानगी नव्हती. रस्त्याच्या एका कडेला मालवाहू ट्रक्स रांग लावून उभे  असलेले दिसत होते. वाटलं, गर्दी म्हणजे हीच असावी.  ते मोठं फाटक...