सहज सुचत गेल्या आणि एकापुढे एक लिहित गेले या साखळी-चारोळ्या. गंमत म्हणजे, पुन्हा पहिल्या चारोळीपाशी नकळत परतले.
-----------------------------
कुणी लिहितं कविता,
कुणी खरडतं चारोळ्या,
पसंद अपनी अपनी, कारण शेवटी सगळ्याच
अंतरात्म्याच्या आरोळ्या...
मारावी आरोळी,
नाहीतर पिटावा हाकारा,
पण समर्थपणे तोंड द्यावं,
परिस्थितीच्या नकारा !
परिस्थिती, परिस्थिती,
अरे कोण ही परिस्थिती?
तिचं नाव पुढे घालून नशिबानं चालवलेली
यथेच्छ निंदा-नालस्ती ती...
जनाची निंदा, मनाची नालस्ती,
करत होते का
पुराणातले ऋषी अगस्ती?
अरे, पुराणातली वांगी
राहू देत पुराणात,
आधी कामाकडे लक्ष द्या,
मीठ विसरलंय वरणात !
मीठ काय अन् साखर काय,
निव्वळ दोन चवी,
आयुष्यगाथा कशी
पंचरसांनी परिपूर्ण हवी !
आयुष्याला म्हणावे गाथा
नसते अशी प्रत्येकाकडे कथा,
मग कुणी खरडतं चारोळ्या,
तर कुणी लिहितं कविता !!
Comments